राज्यभरात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी सेलच्यावतीने राबविण्यात येत आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड सुरु आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र आदीच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतेय. ही बाब ओळखून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीची मुदत दोन दिवस वाढवली आहे.

ट्विटरद्वारे तावडे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत कॅप सेंटरवर जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थांना फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश आज रविवार(28 जुलै ) संध्याकाळपर्यंत निश्चित करता येणार आहेत. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमाचे प्रवेश सोमवार(29 जुलै )पर्यंत निश्चित करण्यास, मुदत वाढ देण्यात आली आहे.