केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी सायंकाळी अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला. त्यानुसार ३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार आहेत. हाच धागा पकडत राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परिक्षा कसा घ्यायचा असा प्रश्न केंद्र सरकार आणि युजीसीला विचारला आहे. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होतं. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारनं अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. पण युजीसी परिक्षा घेण्यावर ठाम होतं. अखेरीस हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. न्यायालयानं परिक्षा घ्यायचा आदेश दिल्यानंतर राज्य सराकरनं तशी तयारीही दर्शवली होती.

मात्र, शनिवारी अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला. यामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात असा आदेश काढण्यात आला. राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुन केंद्राला सवाल केला आहे. उदय सामंत यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. “केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाउन मुळे बंद राहणार ..यूजीसी म्हणते 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा.” असा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्तित केला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत राज्यं परीक्षा पुढे ढकलू शकतात. मात्र यूजीसीसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी नवीन तारीख निश्चित करावी लागेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. तसंच ३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा आधी घेणं अनिवार्य नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने निकालात सांगितलं आहे.