दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे हळूहळू देशभरात पडसाद उमटू लागले आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नामोल्लेख टाळत राऊतांवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमांना शेतकऱ्यांनी वेढा घातला आहे. चर्चेच्या पाच फेऱ्या पार पडल्यानंतरही केंद्र सरकार तोडगा काढण्यात अपयशी ठरलं आहे, तर दुसरीकडे शेतकरी आक्रमक होताना दिसत असून, उद्या भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेनेनं भारत बंदसह आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा- हा राजकीय बंद नाही, त्यामुळे जनतेने स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं – संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी याची घोषणा केली होती. शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांचा नामोल्लेख टाळत खोचक सवाल उपस्थित केला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते????,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

आणखी वाचा- भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं शेतकरी प्रेम नकली – भाजपा

 शिवसेना उतरणार रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या मागण्या आणि ‘भारत बंद’ला शिवसेना पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी रविवारी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेने ही घोषणा केली. त्याचबरोबर दिल्लीत होणाऱ्या बैठकीलाही उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती अकाली दलाच्या शिष्टमंडळानं दिली.