शेतकऱ्यांच्या संपामुळे अनेकांकडून भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड सुरू असतानाच औरंगाबादमध्ये मात्र या सगळ्याचा एक वेगळा पैलू समोर आला आहे. येथील अनेक शेतकऱ्यांची मुले शिक्षणासाठी शहरात राहत आहेत. गावापासून दूर असलेल्या या मुलांना पोटाची भूक भागवण्यासाठी खानावळींचा आश्रय घ्यावा लागणे साहजिकच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या संपामुळे या खानावळींनाही फटका बसला आहे. भाज्यांच्या तुटवड्यामुळे खानावळींमधील रोजच्या जेवणातून भाजी गायब झाली होती. मात्र, याठिकाणी जेवायला येणाऱ्या मुलांना शेतकऱ्यांच्या समस्यांची उपजतच जाण असल्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणे येथे आरडाओरडा होताना दिसत नाही. पोटाला चिमटा काढून आई-बाप आम्हाला शिकवतात. चार दिवस ताटात भाजी नाही मिळाली तर कुठे बिघडतंय. आमचा बाप शेतात किती कष्ट करतो, हे आम्ही पाहिलंय. त्यांच्यासाठी महिनाभरही भाजी मिळाली नाही तरी आनंदाने राहू, अशी समंजसपणाची भावना या मुलांकडून व्यक्त होताना दिसते. भाज्यांच्या दरवाढीने, हॉटेल, खानावळींना फटका शेतकऱ्यांच्या संपानंतर दुसऱ्या दिवसापासून खानावळींवर ताटातली एक एक भाजी गायब झाली. इतर व्यवहार सुरळीत सुरु असले तरी भाजी मिळतेच असं नाही. एरवीदेखील जे स्वस्त आहे, तोच मेन्यू असतो. मात्र सध्या खानावळींच्या मालकांकडून संप सुरु असल्याचं कारण सांगितलं जात आहे. एरवी मुले जेवणात काही कमी जास्त झाले तर लगेचच तक्रार करायची. पूर्वी आवडीची भाजी नसली की जेवणाच्या ताटाकडे पाठ फिरवली जायची. मात्र, गेल्या काही दिवसांत या मुलांमधील समंजसपणाचा प्रत्यय येत आहे. जेवणात आवडीची भाजी नसूनही कोणीही फारशी तक्रार करत नाही, असे खानावळींचे मालक सांगतात. खाद्यगृहे बंद होण्याच्या मार्गावर.. आमच्या खानावळीत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी जेवणासाठी येतात. सध्या बाजारात भाज्या येत नसल्यामुळे कडधान्यावर भागवावं लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही वेळेला एकाच कडधान्याची उसळ किंवा आमटी खावी लागत आहे. परंतु विद्यार्थी कोणतीही तक्रार न करता आनंदाने जे मिळेल ते खात आहेत. बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबामधून आल्यामुळे खानावळीत शेतकरी संपाची चर्चा जोरात असते. याठिकाणी अनेक मुले शहरातूनही आलेली आहेत. शहरातील सगळ्यांना गाव आणि शेती यांची माहिती असेल असं नाही. अनेकांनी गावही बघितलेलं नाही. पण तरीही गावाकडच्या 'दोस्ताचा' हा प्रश्न शहरातील 'फ्रेंन्ड' जोरकस पणे मांडत आहेत. अगदी रोखठोक युक्तिवाद पहायला मिळत आहे. कॉलेजमध्ये राजकीय संघटनांची ऊठबस असल्याने विद्यार्थी वेगवेगळ्या झेंड्याखाली विभागलेले पहायला मिळतात. मात्र सध्या शेतकरी अजेंड्याच्या मुद्द्यावर सगळ्यांचे एकमत पाहायला मिळत आहे.