अकोले :  मराठा आरक्षणाच्या प्रश्नांबाबत मराठा समाजाला बरोबर घेऊन भाजप   मराठा आरक्षणाचा लढा हा सर्व पातळीवर लढणार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत भाजप मराठा समाजाच्या सर्व संघटनाबरोबर असून महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात अजूनही पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही. राज्यसरकार याबाबत उदासीन असल्याची टीका त्यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी येथे विविध मराठा समाजाच्या समन्वयक व भाजपच्या निवडक कार्यकर्त्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड होते.

या वेळी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, जिल्हा संघटक नितीन दिनकर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी आंबरे, जि. प. सदस्य कैलास वाकचौरे,तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंतराव आभाळे, वकील भाऊसाहेब गोडसे, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, शहराध्यक्ष सचिन शेटे, उद्योजक राजेंद्र गोडसे, अमोल वैद्य, नाजिम शेख,आर्किटेक्ट चेतन नाइकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. विखे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत ५६ मोर्चे काढण्यात आले. काही हुतात्मे झाले, त्याचा त्रास भाजप सरकारलाही झाला. मराठा आरक्षणाची अनेक वर्षांची मागणी भाजप सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात टिकेल या पद्धतीने मांडली होती. मात्र सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यांचा वेळ एकमेकांची मनधरणी करण्यात जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत ते उदासीन असल्याने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले आहेत. त्यांच्या या नाकर्तेपणामुळे आरक्षण गमवावे लागले. त्यांनी घाईमध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षण लागू केले मात्र ते आरक्षण केंद्र सरकारने या पूर्वीच लागू केलेले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी ते केंद्र सरकारवर आरोप करीत आहे अशी टीका त्यांनी केली.

या वेळी वकील वसंतर मनकर, भाजपचे जि प गटनेते जालिंदर वाकचौरे, महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, शिवसेना नेते माधवराव तिटमे, मराठा महासंघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे, संभाजी ब्रिगेडचे सुरेश नवले, भाजप महिला आघाडीच्या रेश्मा गोडसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.