भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या घोडबंदर परिसरातील टोलनाका अखेर २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात महामंडळाने परिपत्रक काढून टोलनाक्याची देण्यात आलेली मुदत रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) ने घोडबंदर रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आयआरबी (इंडियन रोड बिल्डर) या कंपनीला २४डिसेंबर २००५ रोजी टोल वसूलीचा ठेका दिला.हा ठेका १५ वर्षांच्या मुदतीसाठी देण्यात आला होता. त्याची मुदत २३ डिसेंबर रोजी संपुष्टात आली होती. दरम्यान मार्च २०२० मध्ये देशात कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्याने या कालावधीत पुरेशा वाहतुकीच्या वर्दळीअभावी कंपनीचे २२ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२०दरम्यान २० कोटी १३ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला. तसे पत्र कंपनीने महामंडळाला पाठवून त्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने महामंडळाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. ती मान्य करीत महामंडळाने कंपनीला २३ डिसेंबर २०२० ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत कंपनीला मुदत वाढ दिल्याचे पत्र कंपनीला ४ डिसेंबर २०२० रोजी पाठविले.दरम्यान मुदत संपुष्टात आल्याने हा टोलनाका बंद करण्यासाठी स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महामंडळाला पत्रव्यवहार करीत आयआरबी कंपनीला टोल वसुलीसाठी मुदतवाढ न देता हा टोलनाकाच बंद करावा,अशी मागणी केली होती. तत्पूर्वी तत्कालीन युती सरकारने येथील टोलधाडीतून लहान वाहनांना सूट दिली. त्यामुळे हलकी वाहनचालकांना व मालकांना दिलासा मिळाला असतानाच येथील टोलवसूलीतुन सर्वच वाहनांना वगळून टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली. तद्नंतर मनसे प्रवक्त तथा टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावरील टोलधाडीचा भंडाफोड उघड केला. तसेच फास्टटॅग स्कॅन न होणाऱ्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसूल करण्याचा गैरप्रकार उजेडात आणल्यानंतर अखेर शनिवारी महामंडळाने घोडबंदर येथील टोलनाक्याची मुदतवाढ मागे घेत हा टोलनाका २३ फेब्रूवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद करण्याचे पत्र जारी केले आहे.