वन्य प्राण्यांची शिकार, कोळसा तयार करण्यासाठी आगी लावण्याचे प्रकार लोकसत्ता प्रतिनिधी पालघर : पालघर जिल्ह्यच्या अनेक भागांमध्ये सह्यद्रीच्या रांगा असून रात्रीच्या वेळी कोळसा तयार करण्याच्या दृष्टीने तसेच इतर काही ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या दृष्टीने जंगल पेटवण्याचा प्रकारांना पुन्हा सुरुवात झाली आहे. पालघर शहरासमोरील काळदुर्ग डोंगरामध्ये मंगळवारी रात्री मोठय़ा प्रमाणात आग लावण्यात आली. हिवाळा संपताच जंगलामध्ये असलेली लहान झुडपं, कारवी व इतर झाडे सुकण्याच क्रिया सुरू होते. अशावेळी झाडांपासून कोळसा तयार करणे किंवा वन्य प्राण्यांना एका दिशेने पळवण्यासाठी जंगलामध्ये आग लावण्याचे प्रकार सुरू होतात. मंगळवारी सायंकाळी काळदुर्ग डोंगरावर वाघोबा मंदिराच्या वरच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात जंगलाला आग लावण्यात आली होती. ती विझवण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न केले. या प्रकाराबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या आगीमध्ये पाच हेक्टर वनाची हानी झाल्याचे पालघर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही आग विझविण्यासाठी चहाडे, कमरे व वरखुंटी ग्रामस्थांनीही सहकार्य केले. संयुक्त वन समितीच्या माध्यमातून देखील जंगलाच्या विविध भागांवर गस्त ठेवण्यात येत असते. त्याचबरोबरीने मोठय़ा प्रमाणात आग लागल्यास केंद्र व राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून त्याबाबत सतर्कता ठेवण्यात येत. मोठी आग असल्यास केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते. आग विझवण्यासाठी अनेकदा स्थानिकांची मदत घेण्यात येत असल्याचे विजय भिसे यांनी सांगितले. सध्या अनेक डोंगराळ भागांमध्ये नव्याने वृक्षारोपण केले असून वनांचे संरक्षण करण्यासाठी विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. देखरेखीसाठी गस्तीपथक हिवाळा संपल्यानंतर जिल्ह्यत अशाच प्रकारे अनेक ठिकाणी वणवा पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सर्व जंगलांच्या प्रवेशाजवळ तसेच विशिष्ट लागवड केलेल्या ठिकाणी जाळरेषा करण्याच्या कामांना जानेवारी महिन्यापासून आरंभ करण्यात आला आहे, असे डहाणूचे उपवनसंरक्षक विजय भिसे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्याचबरोबरीने लावण्यात येणाऱ्या आगीवर देखरेख ठेवण्यासाठी जंगल निरीक्षक व गस्तीपथक नेमण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.