राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या चारा टंचाईच्या परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी परभणी, नगर, सोलापूर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात तालुकास्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर आता परभणी, नगर, सोलापूर या जिल्ह्यातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी त्याठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जामखेड, कर्जत, पारनेर, पाथर्डी, अहमदनगर, शेवगाव, श्रीगोंदा, तसेच परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलु, सोनपठ आणि मानवत या तालुक्यांमध्ये तालुकास्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात येतील.