राहाता : शेतकरी संपाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील पुणतांबा गावात  शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनजंय जाधव यांची कन्या निकिता तसेच सामाजिक कार्यकर्ता संजय जाधव यांची कन्या शुभांगी तसेच पूनम राजेंद्र जाधव ह्य तीन कन्यानी अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आहे. अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यापूर्वी किसान क्रांतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांच्या लेकींनी येथील रुरल हायस्कूल रयत हायस्कूल तसेच प्रवरा उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊ न अन्नत्याग आंदोलनात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊ न राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी सहभागी व्हावे शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयासाठी ही आरपारची लढाई असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या आवाहनास विद्यार्थी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कु. निकिता जाधव यांनी स्पष्ट केले. कालच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक महिला व शेतकऱ्यांच्या लेकीनी हजेरी लावली. ३ तारखेच्या धरणे आंदोलनास तसेच कालपासून सुरु झालेले अन्नत्याग आंदोलनाला पुणतांबा व परिसरातील गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे