डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा मिरजमध्ये निषेध करण्यात आला. यातील एका गणेश मंडळाने विसर्जनादरम्यान राज्य सरकारचा निषेध असा मजकूर असलेला फलक लावला होता. त्यामुळे मिरवणुकीत या मंडळाचा गणपती चर्चेचा विषय ठरला. ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज कानासाठी धोकादायक ठरु शकतो. डॉल्बीचा आवाज १२५ ते १५० डेसिबल ऐवढा असतो. डॉल्बीच्या आवाजामुळे कानाचे विकार जडू शकतात. त्यामुळे कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचा संकल्प प्रशासनाने केला होता. डॉल्बी मुक्त उत्सवासाठी मिरजमध्येही पोलिसांनी बैठक घेतली होती. डॉल्बी लावणा-या मंडळांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या विसर्जनात फारसा डॉल्बीचा वापर केला गेला नाही. पोलिसांनीही डॉल्बी लावणा-या दोघा मंडळांवर गुन्हा दाखल केला होता. मिरजमध्ये पोलिसांच्या या कठोर भूमिकेवर मंडळांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याचे पडसाद विसर्जन मिरवणुकीतही दिसून आले. एका मंडळाने राज्य सरकारच्या निषेधाचा बॅनरचा लावला होता.