बीड : विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी निवडून आलेल्या प्रत्येकाने चुणूक दाखवावी. आम्ही कोणाच्या पायात पाय घालणार नाही, हा संस्कार आमच्यावर आहे. नवीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही जिल्ह्यच्या विकासाची गती कायम ठेवावी, अशा जाहीर शुभेच्छा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. कोणतेही पद आपल्याकडे नसले तरी सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी आपण १६ वर्षांंपासून भक्त म्हणून येत असून सर्वसामान्यांची सेवा करण्याची शक्ती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकीय विरोधक बहीण-भाऊ एका व्यासपीठावर आल्याने ते काय बोलतात, याबाबत उत्सुकता होती. बीड जिल्ह्यतील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या आजच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल उधळण्यात आला. मागील १६ वर्षांपासून धनंजय मुंडे हे रात्री मुक्काम करून सकाळी महापूजा केल्यानंतर निघून जात. जाहीर कार्यक्रमाला थांबत नव्हते. या वेळी मंत्री असल्यामुळे महंत विठ्ठल महाराज यांनी धनंजय यांना व्यासपीठावरून बोलण्याची सूचना केली. दरवर्षी प्रमाणे या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह या भागातील आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकरसह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. व्यासपीठावर आरतीच्या वेळी मुंडे बहीण-भाऊ एकत्र उपस्थित झाले. मात्र, धनंजय यांनी सुरुवातीलाच भाषण केले. धार्मिक कार्यक्रमात मी कधीही भाषण करत नाही, मात्र महंतांच्या सूचनेवरून बोलत आहे. वामनभाऊंचा भक्त म्हणून गडावर येतो. सत्तेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणाचाही नामोल्लेख केला नाही. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र आम्ही पराभूत झालो असलो तरी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी चांगले काम करावे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही विकासाची गती कायम ठेवावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.