मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भेटवस्तू द्यावी, असा विचित्र सल्ला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. मंत्रिपदावरील एका जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीही चंद्रकांत पाटील हे आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत.

सांगलीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हा अजब सल्ला दिला. सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपानेही पालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शनिवारी सांगलीत पक्षाने कार्यकर्त्यांचे बूथ प्रशिक्षण आयोजित केल होते.

बूथ रचना झाली आहे, १५ दिवसांत कार्यकर्त्यांनी किमान २०० घरी जाऊन मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे. मतदारांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना भेटवस्तू द्यावी, असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गत महिन्यातही पाटील हे कर्नाटकातील गोकाक येथील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये गाणे म्हणून वाद निर्माण केला होता. गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला त्यांनी हजेरी लावली. मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर भाषणाची सुरुवात ‘हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू’ (जन्माला यायचे तर कर्नाटकात जन्म घ्यावा) या कन्नड गाण्याने करून उपस्थितांना खूश करण्याचा प्रयत्न केला होता. पण पाटील यांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया उमटली होती.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सरकार असेच सगळे माफ करत गेले तर एके दिवशी सरकारची परिस्थिती कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे होईल असे, त्यांनी म्हटले होते.