मराठवाडय़ातील दुष्काळाची तीव्रता किती? जानेवारी ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत २२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे प्रतिदिन सरासरी दोन आत्महत्या. एका बाजूला हे भीषण वास्तव असताना दुसरीकडे हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने झडणाऱ्या भोजनावळींच्या आहारी गेलेली जनता मात्र बुंदी-गुलाबजामचे बेत आखण्यात रममाण आहे.
   बीड जिल्ह्य़ातील िहगणी गावात तीन लाख लोकांचे जेवण बनविण्यासाठी खास राजस्थानहून आचारी मागविण्यात आले. आक्रसलेल्या अर्थकारणात हरिनामाच्या गजरासाठी कोटय़वधी रुपयांच्या खर्चावर आता वारकरी संप्रदायातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या काळात उत्सव करू नका, असे आम्ही सांगत आहोत, असे चतन्यमहाराज देगलूरकर यांनी सांगितले. मराठवाडय़ातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची चलती तर आहेच; पण गावोगावी पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने हरिनाम सप्ताहांचा सुकाळ आहे. अलीकडच्या काळात सप्ताहाच्या अर्थकारणात नेत्यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण बनला आहे. मराठवाडय़ाची राजधानी अशी ओळख असणाऱ्या औरंगाबादचे खासदार तर प्रत्येक भंडाऱ्यात आपला सहभाग कसा असेल, याची आवर्जून दक्षता घेतात. बहुतांश जिल्ह्य़ांत काल्याच्या कीर्तनानंतरच्या भोजनावळीसाठी लागणारा सर्व खर्च नेते करतात. भंडाऱ्याच्या दिवशी पाण्याच्या टँकरपासून लाखोच्या भोजनावळीसाठी लागणारे सर्व साहित्य नेते देत आहेत.

खर्च सत्कारणी लावावा..
*सप्ताहावर होणारा कोटय़वधीचा खर्च कमी करून तो गावातील पाणी अडविण्याच्या योजनांवर खर्च केला पाहिजे.
*आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर हा पसा खर्च व्हावा. भागवतधर्माची पताका खांद्यावर घेतलेल्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

सार्वजनिक उत्सवात मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. पार्टीला बसलेले लोक रात्रीत २०-२५ हजार रुपये खर्च करतात. त्यामुळे हरिनाम सप्ताहात कोणी अन्नदान करीत असेल तर ते चूक म्हणता येणार नाही.
– बाबामहाराज सातारकर, कीर्तनकार

अमाप पैसा खर्च करून सप्ताह करण्याऐवजी त्या उपक्रमात काटकसर करून गावच्या विकासात सहभाग वाढला पाहिजे. पण अजून तसे होताना दिसत नाही.
– भारतबुवा रामदासी