रायगड जिल्ह्यातील महाड येथे बुधवारी रात्री विषारी वायूच्या गळतीमुळे चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. येथील औद्योगिक वसाहतीत रात्री आठच्या सुमारास सुमारास हा प्रकार घडला. मोठ्याप्रमाणावर झालेल्या विषारी वायूच्या या गळतीमुळे चौघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर अवस्थेत आहे. येथील एका भंगाराच्या गोडाऊनमध्ये केमिकलचे पिंप आणण्यात आले होते. हे पिंप उतरवले जात असताना अचानकपणे वायूगळतीला सुरूवात झाली. या वायूगळतीची तीव्रता इतकी होती की या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. दरम्यान, यापासून कोणालाही इजा होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासन खबरदारी घेत आहे. हा प्रकार घडला तो भंगार डेपो शकील या इसमाचा असून येथे पाच कामगार काम करीत होते. दरम्यान, याप्रकरणात पोलीसांकडून तपास सुरू असून केमिकलचे हे ड्रम कोणत्या कंपनीतून आणले होते, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.