चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्याला दिल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. राम शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनीही राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून सरकारची जबाबदारी झटकण्याची ही भाषा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  दरम्यान, राम शिंदे यांनी हा आरोप फेटाळला असून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण ग्रामीण आणि दुष्काळी भागाचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे मला या प्रश्नांची तीव्रता माहीत आहे. मी असे म्हटलेलोच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला व दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्री शिंदे यांना सांगत होता. यावर त्या शेतकऱ्याचे समाधान करण्याची जबाबदारी शिंदे यांची होती. परंतु, त्यांनी त्या शेतकऱ्याला वेगळेच उत्तर दिले. चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी उपस्थित असलेल्या काही स्थानिक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी हसून प्रतिसाद दिला.

दरम्यान, शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पाटील यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. अशी उत्तरे देणाऱ्यांना मंत्री म्हणावं की नाही हा प्रश्न पडतो. आमचे पाहुणे जम्मू-काश्मीर किंवा तामिळनाडूला राहत नाहीत. तेही या दुष्काळी भागातच राहतात. शिंदे यांना काय म्हणायचं आहे. स्वत:ची जबाबदारी ढकलण्याची ही भाषा आहे. यावर जास्त न बोलणंच ठीक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.