कांदा आणि डाळी पाठोपाठ आता खाद्य तेलाचे भाव कडाडले आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आता एकापाठोपाठ एक जीवनावश्यक वस्तुंच्या भाववाढीचा सामना करावा लागत आहे. आता रोजच्या जीवनातील खाद्य तेलाच्या भावात किलो मागे १० ते १५ रूपयांनी वाढ झाली आहे.

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने पामतेल वापरता येत नाही. कारण ते थीजून जाते तर इतर खाद्य तेलांचे भाव कडाडले आहेत. सोयाबीनच्या बीयांचा पुरवठा कमी झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी  झाले. परिणामी विविध खाद्य तेलाचे भाव वाढले. खाद्य तेलाचे भाव वाढल्याचा परिणाम इतर वस्तुंच्या भाववाढीवर होणार आहे. हॉटेल, उपहारगृहातील विविध खाद्यपदार्थ पदार्थ बनविण्यासाठी तेल वापरण्यात येते. त्यामुळे या सर्वच वस्तुंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने खाद्य तेल आयात केले, तरच तेलाच्या भाव वाढीला आळा बसू शकतो. अन्यथा आगामी काही दिवसांत तेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

भावातील फरक (प्रतिकिलो)

एक नोव्हेंबर २०१९ चे दर (रुपयांत) २८ डिसेंबर २०१९ चे दर (रुपयांत)

सोयाबीन  ८५ ते ८७ १०५ ते १०८

सूर्यफूल   ९६ ते ९८ ११० ते ११५

पाम  तेल     ७५ ते ७७ ९० ते ९२

शेंगदाणा  १२४ ते १२६    १३५ ते १३९