जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्या ठिकाणी केळीच्या बागांचं झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेत आहेत. या अगोदर त्यांनी खासदार रक्षा खडसे यांची देखील भेट घेतली आहे. यांनी केळी बागांचं झालेल्या नुकसानीची पाहणी करता, फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे विमा नसलेल्या शेतकऱ्यांना देखील सरकारने मदत करावी. तसेच, विमा कंपनीने देखील शेतकऱ्यास सरसकट नुकसानभरापाई दिली पाहिजे. अशी मागणी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील उंचादा येथे मी आलो आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. १०० टक्के केळी बागाचं नुकसान झालेलं आहे. मी शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांची अशी अपेक्षा आहे की, एकतर विमा कंपनीने सरसकट त्यांना नुकसानभरापाई दिली पाहिजे. कारण, विमा कंपनी विविध मुद्दे उपस्थित करून अडचणी निर्माण करत आहे. दुसरं महत्वाचं आहे की सरकारने देखील मोठ्याप्रमाणावर मदत केली पाहिजे. एवढच नाही तर ज्या शेतकऱ्याचा विमा नाही त्याला देखील सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. कारण मागील काळात आमचं सरकार होतं त्या वेळी ज्यांचा विमा नव्हता त्यांनाही ५० टक्के रक्कम आपण विमा काढला असं समजून त्या काळात दिली होती.”

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

तसेच, “दुसरं महत्वाचं असं आहे की, एकूण आता विम्याची रक्कम मिळताना जी अडचण होत आहे. विशेषता मागील काळात जेव्हा आमचे आमदार हरिभाऊ जावळे यांची एक समिती आम्ही तयार केली होती. आणि हरिभाऊ जावळे समितीने केळीच्या संदर्भात विम्याचे निकष ठरवून त्यावेळेस आपण तसं टेंडर काढलं होतं आणि त्यावर्षी विमा कंपन्यांनी चांगला पैसा शेतकऱ्यांना दिला. मात्र मागील वर्षी हरिभाऊ जावळे समितीचे सर्व निकष बदलवण्यात आले आणि नव्या निकषाने केळीच्या विम्याचा हा टेंडर काढला गेला. त्यामुळे विमा कंपन्यांचा आता अधिक फायदा होतो आहे. विमा कंपन्या पाहिजे त्या प्रमाणात मदत करत नाहीत. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की, हरिभाऊ जावळे समितीचे जे निकष होते, त्या निकषानुसारच या ठिकाणी केळीचा विमा उतरवला गेला पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे.” असं देखील यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.