युवक काँग्रेस कार्यकर्त्यां कल्पना गिरी यांच्या खुनाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी दिली. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या बाबत लातूर पोलिसांना लेखी आदेश दिले.या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्याची विनंतीही करण्यात आली. गेल्या २१ मार्चला युवक काँग्रेसच्या लातूर विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीस कल्पना गिरी गायब झाल्या होत्या. तुळजापूरजवळील तलावात दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली. दोघे अजून फरारी आहेत. शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. अखेर दीड महिन्यानंतर पोलिसांनी आता हे प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.