मूलभूत सुविधांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुलाबा किल्ल्याची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. योग्य देखभालीअभावी किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या अंतर्गत भागात सर्वत्र गवताचे साम्राज्य पसरले आहे. तर येणाऱ्या पर्यटकांसाठी पाण्याची सुविधादेखील उपलब्ध नाही. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले, त्यापकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्या’ने पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. आज कुलाबा किल्ला हा पुरातत्त्व विभागाकडे देखरेखीस आहे. मात्र किल्ल्याचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छ भारत मिशनचे तीनतेरा वाजले आहेत. कुलाबा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून पुरातत्त्व विभागामार्फत २५ रुपये, तर परदेशी पर्यटकांकडून ३०० रुपये तिकीट आकारले जाते. मात्र किल्ला पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना पुरातत्त्व विभागाकडून साधी स्वच्छतागृहाची तसेच पाण्याची सोयही करता आलेली नाही. किल्ल्यात स्वच्छतागृह बांधले असून काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. तर येणाऱ्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा किल्ल्यात केलेली नाही. तसेच किल्ल्याचा आतील परिसर हा मोठमोठय़ा गवताने भरलेला आहे. पुरातत्त्व विभाग या स्वच्छतेकडे व पर्यटकांच्या सुविधाकडे कानाडोळा करीत असून काही सामाजिक संस्था, शिवप्रेमी तरुण हे किल्ल्याचा परिसर अनेकवेळा साफ करतात. मात्र पुरातत्त्व विभाग मात्र पर्यटकांकडून फक्त तिकिटाचे पसे उकळण्याचेच काम करीत आहेत. स्वच्छतागृह बंद असल्याने पर्यटकांना किल्ल्याच्या तटबंदीचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे किल्याचे पावित्र्य नष्ट होत आहे. त्याचबरोबर किल्ल्यात राहत असलेले नागरिक हे आत असलेल्या पोखरणीत आपले कपडे धूत असल्याने पोखरणीमधील पाणी अस्वच्छ होण्याचा धोका आहे. याकडेही पुरातत्त्व विभाग कानाडोळा करताना दिसत आहे. कुलाबा किल्यात उजव्या सोंडेचा गणपती मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, दर्गा, इतिहासकालीन तोफा, गोडय़ा पाण्याच्या विहीर, दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण ही पर्यटकांना बघण्याची प्रेक्षणीय स्थळे आहेत. मात्र किल्ल्यातील अस्वच्छतेमुळे येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत पुरातत्त्व विभागाचे अधिकारी इलिकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असतो तो झाला नाही. योग्य देखभालीआभावी किल्ल्याची तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली आहे. या तटबंदीची तातडीने दुरुस्ती केली नाही, तर मराठी आरमाराच्या राजधानीचे ठिकाण असलेला कुलाबा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ‘कुलाबा किल्ल्यात असलेल्या विहिरीचा व पोखरणीच्या पाण्याचा योग्य वापर करून त्याठिकाणी फिल्टर प्लॅनसह आरओ युनिट व कूलर बसविले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच किल्ल्यातील स्वच्छतागृह पुरातत्त्व विभागाने त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. स्वच्छतेबाबत पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याने स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता या समस्या पुरातत्त्व विभागाने सोडविणे गरजेचे आहे. फिल्टर प्लॅन बसविल्यानंतर किल्यात प्लास्टिक बाटल्या टाकण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद होईल. - रघुजीराजे आंग्रे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज