आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद, पुढील सुनावणी बुधवारी दिल्लीतील आरुषी तलवार हत्याकांडात परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य न धरल्याने आरोपींची सुटका करण्यात आली. कोपर्डी खटलाही अशाच प्रकारचा असून परिस्थितीजन्य पुराव्यावर तो आधारलेला असल्याचे आज आरोपी संतोष भवाळच्या वकील विजयालक्ष्मी खोपडे यांनी सुनावणीच्या दरम्यान सांगितले. कोपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. आरोपी संतोष भवाळ बचावाचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. पुढील सुनावणी बुधवारी (८ नोव्हेंबर) व गुरुवारी (९ नोव्हेंबर) ठेवण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांमुळे कोपर्डी खटल्याच्या निकालाला विलंब झाल्याचा आरोप सरकार पक्षाकडून केला जात असून त्यामध्ये तथ्य नाही. कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे म्हणजे उशीर झाला असे होत नाही, असे खोपडे यांनी स्पष्ट केले. तिसरा आरोपी नितीन भलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद सुरु केला असून तो अपूर्ण राहिला. कोपर्डी प्रकरणात अगोदरच फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली, आरोपी तयार केले, त्यानंतर पुरावे गोळा केले; त्यामुळे हा खटलाच बनावट आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी वकिलाची नेमणूक होते. पण येथे घटना घडल्यानंतर १० व्याच दिवशी सरकारी वकिलांनी काम सुरु केले. त्यांच्या सल्ल्यानेच खोटी कागदपत्रे व साक्षीदार तयार करण्यात आले, असा आक्षेप खोपडे यांनी घेतला. आरोपींच्या अटक पंचनाम्यावर वेळ नोंदविण्यात आलेली नाही. तर एक साक्षीदार हा ऐनवेळी सरकारी पक्षाने घेऊन त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी नितीन भलुमे हा जितेंद्र शिंदेचा नातेवाईक असल्याने त्याला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याशी त्याचा थेट संबंध असल्याचा पुरावाही सरकारी पक्ष देऊ शकलेले नसल्याने या आरोपीला खोटे अडकविण्यात आले असल्याचा युक्तिवाद विधिज्ञ प्रकाश आहेर यांनी केला. तर या गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपीला पाहणारा एक साक्षीदार या दोघांविरुध्द कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असून, गुन्ह्याची पाश्र्वभूमी असलेल्यांची साक्ष न्यायालयाने ग्रा धरू नये, असा युक्तिवाद आहेर यांनी केला. आरोपींना नार्को टेस्टसाठी मुंबईला नेल्याचे तपासी अधिकारी सांगत असले तरी नार्को टेस्टचा अहवाल आरोपपत्राबरोबर का जोडला नाही, असा प्रश्न त्यांनी युक्तिवादात केला.