पीएसआय भरतीमध्ये ४० उमेदवारांचे नुकसान देवेश गोंडाणे, लोकसत्ता नागपूर : मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ५ जुलैच्या शासन निर्णयाचा आधार घेत बदललेल्या आरक्षणानुसार विविध पदांच्या सुधारित याद्या आणि ‘कट ऑफ’ जाहीर केला आहे. मात्र, या नवीन निर्णयामुळे मुलाखती किंवा शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील बहुतांश उमेदवारांना मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातील ४० उमेदवारांना तर स्थापत्य अभियांत्रिकीच्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील सरासरी ५०उमेदवारांना वगळण्यात आले आहे. सुधारित याद्यांमुळे पदभरतीला गती आली असली तरी परीक्षेची काठिण्य पातळी पार करून मुलाखतीपर्यंत आल्यावर आरक्षणाच्या गोंधळामुळे उमेदवार वगळले जात असल्याने या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर आहे. मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर एमपीएससीने सुधारित बिंदूनामावली व विविध पदांचे सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर केले आहेत. या सुधारित याद्या आणि ‘कट ऑफ’चे निरीक्षण केले असता पोलीस उपनिरीक्षक पदांमध्ये ४० एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वगळण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ४९६ जागांसाठी सुरुवातीला २१२७ उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली होती. सुधारित यादी तयार करताना एसईबीसीच्या १३ टक्के जागा या खुल्या वर्गात रूपांतरित करण्यात आल्या. यामुळे खुल्या वर्गाच्या जागा वाढल्याने ‘कट ऑफ’ हा आता १२५ वरून १२३ पर्यंत कमी झाला. मात्र, एसईबीसी प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ हा केवळ १२१ असल्याने १२१ ते १२३ गुण मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक भरतीमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नसल्याने एसईबीसी उमेदवारांना तो पर्यायही नसल्याने ४० उमेदवारांना सुधारित याद्यांचा सरळ फटका बसला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठी झालेले सुधारित बदल उदाहरणदाखल समजून घेताना..