नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात प्रेमी युगुलाने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी समोर आली. दीक्षा जजबा टोंपे (१८) व तानाजी शिवाजी सोनकांबळे (वय २९) अशी या प्रेमी युगुलाची नावे आहेत.

देगलूरकर तालुक्यातील मुजळगा गावात राहणाऱ्या दीक्षा टोंपे या तरुणीचे शिवाजी सोनकांबळे याच्याशी प्रेमसंबंध होते. तानाजी हा दीक्षाच्या वडिलांच्या भाच्याचा मुलगा आहे. दीक्षा ही गेल्या दोन वर्षांपासून घरीच होती. चार दिवसापूर्वी दीक्षा आणि शिवाजी हे दोघे घरातून निघून गेले. नातेवाईकांनी दोघांचा शोध घेतला. पण दोघांचा ठावठिकाणा कळत नसल्याने शेवटी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

शनिवारी संध्याकाळी दोघांचे मृतदेह चैनपूर येथील तलावात सापडले. पोलिसांनी याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना दिली. याप्रकरणी दीक्षाचे वडील जजबा टोपे यांनी प्रेम संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.