राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपान करणारे आता कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत. कारण गड-किल्ल्यांचे पावित्र राखण्यासाठी तिथे मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्याचा अधिकृत शासकीय अध्यादेशही गृहमंत्रालयाने शनिवारी काढला. या अध्यादेशानुसार, गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास १०,००० रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. Maharashtra Home Department has issued a government resolution (GR) banning consumption of alcohol at ancient forts in the state. The offenders could face a fine of Rs 10,000 and six months imprisonment on violation of the order. — ANI (@ANI) February 2, 2020 महाराष्ट्रात सुमारे ३५० गड-किल्ले आहेत. यांपैकी अनेक किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे पावित्र्या राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू केली आहे. अध्यादेशाद्वारे किल्ल्यांवर मद्यमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश दिले आहेत. या ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी देणाऱे पर्यटक त्यांच्या पावित्र्यापासून अनभिज्ञ असतात. त्यामुळे निवांत जागा असल्याच्या भावनेतून ते अनेकदा येथे मद्यही घेऊन येतात आणि इथली शांतता आणि पावित्र्य भंग करतात, त्यामुळे यासंदर्भात कडक कारवाईची नियमावली जाहीर करण्यात आल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे. अध्यादेशानुसार, अशा प्रकारे किल्ल्यांवर पहिल्यांदाच कोणी मद्यपान करताना आढळल्यास त्याला महाराष्ट्र दारुबंदी अभियान १९४९ च्या कलम ८५ नुसार १०,००० रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तर दुसऱ्यांदा असा गुन्हा झाल्यास त्याला एका वर्षाचा तुरुंगवास आणि १०,००० रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर 'मद्यपानास सक्त मनाई आहे' असे इशारा फलक लावण्याचे आदेशही गृहमंत्रालयाकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.