अलिबाग “निसर्ग चक्रीवादळात कोकणातील बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना आपण पूर्वीच्‍या निकषांच्‍या तुलनेत दुपटीहून अधिक मदत देऊ केली आहे. परंतु ही मदत तोकडी असल्‍याचे स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी माझ्या निदर्शनास आणून दिले. यावर निश्चितपणे विचार केला जाईल,” असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्‍पष्‍ट केलं. बाळासाहेब थोरात यांनी आज वादळग्रस्‍त अलिबाग व मुरूड तालुक्‍याला भेट देवून नुकसानीची पाहणी केली. त्याचबरोबर काशिद येथे आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते .

“कोकणातील शेतकऱ्यांची जमीन धारणा ही गुंठ्यात आहे . त्‍यामुळे त्‍यांना मिळणारी मदतदेखील तुटपुंजी आहे . शिवाय बागायतींचे नुकसान झाल्‍याने पुढील किमान १० वर्षे तरी उत्‍पन्‍न मिळणार नाही. त्‍यामुळे राज्‍याच्‍या अन्‍य भागात लावले जाणारे निकष इथं लागू केल्‍यास ते योग्‍य होणार नाही. ही बाब स्‍थानिक लोकप्रतिनिधींना माझ्या निदर्शनास आणून दिली आहे,” असं थोरात यांनी सांगितले.

“वादळग्रस्‍त भागात वीजपुरवठा खंडित झाल्‍याने मोठी समस्‍या निर्माण झाली आहे. वीजपुरवठा तातडीने सुरू व्‍हावा, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्‍न सुरू आहेत. लोकप्रतिनिधी, मंत्र्यांच्‍या दौऱ्यांमुळे प्रशासन अडकून पडते, ही बाब खरी असली तरी परीस्थिती पाहणे गरजेचे आहे. ज्‍या ज्‍या खात्‍याशी संबंधित नुकसान झाले आहे. त्‍या मंत्र्यांनी दौरे करून वस्‍तुस्थिती जाणून घेतली तर त्‍यात गैर नाही,” असं थोरात यावेळी म्‍हणाले.

थोरात यांनी आपल्‍या दौऱ्यात नागाव, चौल काशिद येथे वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देवून पाहणी केली. वादळाचा फटका बसलेल्या ग्रामस्थांनी चर्चा करून त्‍यांच्या समस्‍या जाणून घेतल्‍या. काही वादळग्रस्‍तांना थोरात यांच्‍या हस्‍ते प्रातिनिधीक स्‍वरूपात मदतीच्‍या धनादेशांचे वाटप करण्‍यात आले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा योगिता पारधी, कॉंग्रेस जिल्‍हाध्‍यक्ष माणिक जगताप, महिला अध्‍यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, जिल्‍हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्‍हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी शारदा पोवार आदी उपस्थित होते.

… म्‍हणून फडणवीस फिरू शकले

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वादळग्रस्‍त भागात फिरू श‍कले. याचा अर्थ प्रशासनाने रस्‍ते मोकळे केले म्‍हणूनच ते फिरू शकले . मी स्‍वतः त्‍यांना टीव्‍हीवर लाईव्‍ह पाहिलं आहे,” असा टोला बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना लगावला. प्रशासनाचे काम दिसत नाही असा आरोप फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात केला होता. त्‍यावर ते बोलत होते. “लोकशाहीत विरोधी पक्षाचे जे काम आहे ते करत आहेत,” असंही थोरात म्हणाले.