लॉकडाउनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करत असाल, तर खबरदार. कारण लॉकडाउनबद्दलच्या मेसेजमुळे तुम्हाला पोलिसी कारवाईला सामोर जावं लागू शकतं. हो, हे खरं असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे. त्यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात करोनाचं संकट वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. व्हॉट्सअपसह सोशल मीडियातून लॉकडाउन लागू होणार असल्याच्या आणि लॉकडाउन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्याचा जात आहे. लॉकडाउनच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर अनेक गैरसमजही पसरत असून, राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. "महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत," असं गृहमंत्री देशमुख यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा- “महाराष्ट्रात आढळलेला करोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक” महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.@MahaCyber1 — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 22, 2021 सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉकडाउन लागू झाल्याच्या अफवा पसरवल्यामुळे नागरिक गोंधळून जात आहेत. राज्यातील अनेक शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं संचारबंदी आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, सोशल मीडियावर राज्यातच लॉकडाउन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.