काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दांत टीका केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ‘आम्ही सर्व सावरकर’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांचं ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. भाजपाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

शरद पोंक्षे यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांचा दिल्लीमधील शेंबडा मुलगा असा उल्लेख केला. “मला तर त्यांचे आभार मानायचे आहेत. मी त्यांच्यावर चिडत नाही. काही मुलं गतिमंद असतात. उलट मी त्यांचे आभार मानतो,” असा उपहासात्मक टोला शरद पोंक्षे यांनी लगावला आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “मी त्यांना विनंती करतो की, सतत दीड दोन महिन्यांनी त्यांनी असंच विधान करत राहावं. त्याच्यामुळे काय होतं, हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण पेटतही लवकर नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो. आपल्यातला शिवाजी, सावरकर लवकर जागाच होत नाही. मग अशी माणसं उपयोगी पडतात. ते तिकडं वेड्यासारखा बोलले की सगळ्यांच्या मनातील सावरकर, शिवाजी, राणा प्रताप, टिळक हे जागे होतात. मग आपण धडाधड त्यांच्याबद्दल शोधाशोध करण्यास सुरुवात करतो. काही मिळतंय का.. असं म्हणत व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होण्यास सुरुवात होते. त्यात माझीही अनेक भाषणं अनेक ठिकाणी फिरतात. मग माझ्यातही सावरकरांबद्दल जागृती होते, ही किती चांगली गोष्ट आहे”.

आणखी वाचा – RSS चे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलत आहेत – राहुल गांधी

काय म्हणाले होते राहुल गांधी ?
‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले होते. राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल”..