वाडा, विक्रमगडमधील आदिवासी भागांत उत्पन्न रमेश पाटील, वाडा जूनच्या पहिल्या तीन आठवडय़ांची सरासरी अवघ्या चार दिवसांत भरून काढणाऱ्या पावसाने रानभाज्यांची मेजवानीही उपलब्ध करून दिली आहे. मंडईत नेहमीच्या भाज्यांचे दर चढे असताना वाडा, विक्रमगडमधील बाजारपेठांत ग्रामीण, आदिवासी भागांतून रानभाज्या आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. वाडा, विक्रमगड या ग्रामीण भागातील बाजारपेठेत मटार, फ्लॉवर, ढोबळी मिर्ची, घेवडय़ाचे दर प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कोंथिबिरीची जुडी दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत विकली जात आहे. संततधार पावसामुळे हे दर रोज वाढत आहेत. मात्र याच वेळेला बाजारात दाखल झालेल्या रानभाज्यांनी दिलासा दिला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून शेवळी या रानभाजीने अनेकांना आकर्षित केले आहे. याशिवाय बाफली, खुरासनी, माटभाजी, करडू या पालेभाज्या आल्या आहेत. अवघ्या दहा ते २० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या रानातील पालेभाजीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी पालेभाज्यांच्या आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रानभाज्यांना येथील ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. आरोग्यदायी आहार उन्हाळ्यातील वाढत्या वणव्यांमुळे जंगलात रानभाज्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. कुठल्याही सेंद्रिय अथवा रासायनिक खतांची मात्रा नसलेली शेवळी, बाफली या भाज्यांना खूपच मागणी आहे. विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधी भाजी म्हणून अनेक जण ही भाजी आहारात आवडीने खातात. पूर्वीप्रमाणे मोठय़ा प्रमाणात रानभाज्या जंगलात मिळणे कठीण झाले आहे. सध्या कुठलाही रोजगार उपलब्ध नसल्याने जंगलात फिरून या रानभाज्या विकून आम्ही संसारगाडा चालवतो. - रुई पाटेकर- सूर्यमाळ, रानभाज्या विक्रेती