केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. शिवसेनेचे हिंगोलीमधील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य केलं होतं. बांगर यांच्या टीकेला आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यांने आयुष्यात साधा उंदीर मारला नाही, तो काय कोथळा काढणार असं राणे म्हणाले.

“ज्याने आयुष्यात साधा उंदीर मारला नाही तो माझा कधी कोथळा बाहेर काढणार? त्याला दाखवावा लागेल कोथळा कसा असतो,” असं नारायण राणेंनी बांगर यांना म्हटलंय. तसेच “शिवसेना वाढली त्यात माझा मोठा वाटा आहे, हे विसरू नका. मी शिवसेनेत असताना आताचे कोणीच त्यावेळी नव्हते, अपशब्द वापरणारे ही नव्हते,” असंदेखील राणे म्हणाले.

काय म्हणाले होते आमदार बांगर..

नारायण राणेंवर टीका करताना शिवसेना आमदार संतोष बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ”अरे तू काय सांगतो कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलीस संरक्षण थोडसं बाजूला कर, हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केलं, तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको.” दरम्यान, संतोष बांगर यांच्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाकडून बांगर यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली जाणार आहे.