लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरील चर्चे दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती टिका केली. तसेच मोदींच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष असेल पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही कटू भावना नाही असं राहुल यांनी सांगितले. इतक्यावरच न थांबता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इथे जाऊन त्यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत सत्ताधारी भाजपचे खासदारही आश्चर्यचकित झाले. मात्र त्यानंतर इंटरनेटपासून अनेक चर्चासत्रांमध्ये राहुल गांधीनी मारलेली ही मिठी योग्य की अयोग्य यावर अनेकांनी आपली मते नोंदवली. काहींना ही कृती चूक वाटली तर काहींनी त्यांचे समर्थन केले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही राहुल गांधी यांनी पदाचा मान बाळगायला हवा होता असे सांगत राहुल यांची वर्तवणूक चुकल्याचे मत नोंदवले. या मिठीच्या समर्थनार्थ आणि विरोधात बोलणाऱ्या ट्विपल्सने #RahulHugsModi हा हॅशटॅग वापरत आपली मते ट्विटवर नोंदवली आहेत. विशेष म्हणजे हा हॅशटॅग भारतात दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड करत असून रात्री पावणे अकरापर्यंत हा हॅशटॅग वापरून तब्बल ४० हजार ५००हून अधिक ट्विट पडले आहेत. याच मिठीवरून सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधीच्या मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते असा प्रश्न उपस्थित करताना राज यांनी ट्विटवर ‘जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती?’ हा प्रश्न ट्विट केला आहे. फेसबुकवरही त्यांनी हेच पोस्ट केले आहे. जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती? #RahulHugsModi — Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2018 राहुल गांधी मोदींना मिठी मारायला गेले तेव्हा मोदी जागेवरून उठलेच नाहीत आणि मोदी बसलेले असतानाच राहुल गांधीनी त्यांना मिठी मारली. मोदी आणि राहुल यांच्या गळाभेटीचा हा आगळा वेगळा फोटो व्हायरल झाला आहे. जागेवरून न उठण्याच्या मोदींच्या यांच वागण्यावर राज यांनी आपल्या ट्विटमधून निशाणा साधला आहे. कालच राज यांनी शिवसेना अविश्वास ठरावाच्या वेळी मोदी सरकारविरोधात भूमिका घेण्याऐवजी त्यांच्यासमोर घरंगळत जाईल अशी शक्यता व्यक्त केली होती. आणि राज यांचा हा अंदाज तंतोतंत खऱा ठरला आणि आज शिवसेनेने मोदी सरकारविरोधात मतदान करण्याऐवजी उपस्थित न राहता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.