"मनसेनं आतापर्यंत जे काही केलं ते उघडपणे केलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनाही उघडपणे पाठिंबा दिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान देशहिताची भूमिका मांडली. आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकासोबत आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही. आम्हाला तशी गरज पडली नाही. शिवसेनेनं मराठी माणसांबोत हिंदूंसोबत दगाबाजी केली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे," असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिलेला तो त्यांनी जनतेला अर्धवट सांगितला. शिवसेनेची स्वबळावर सत्ता आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू असा शब्द त्यांनी दिलेला. त्यातला अर्धा भाग त्यांनी लपवला आणि अर्धा भाग मराठी माणसासमोर, जनतेसमोर सांगितला. त्यांनी सर्वांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. २०१७ मध्ये महानगरपालिकेची स्वतंत्र निवडणूक लढवून त्यांनी त्याची चाचपणीही केली. त्यावेळी मुख्यमंत्री तर सोडा महापौरही निवडून आणू शकत नाही हे त्यांना समजलं. त्यावेळी मराठी माणसांसोबत आणि हिंदूंसोबत दगाबाजी करण्याचं काम शिवसेनेनं केलं," असं देशपांडे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची म्हणजेच आताची जी शिवसेना आहे ती दगाबाज शिवसेना असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. भाजपासोबत जाण्याचा अद्याप निर्णय नाही भाजपासोबत जाण्याचा निर्णय अद्याप राज ठाकरे यांनी घेतला नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या मनात भीती आहे. त्यांनी मनसेसोबत कायम दगाबाजी केली. २०१७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं आमच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर तेच प्रस्तावावरून फिरले. आमचे सहा नगरसेवक त्यांनी त्यावेळी चोरसे आणि स्वत:च्या भावाच्याच पाठीत खंजीर खुपसला. २०१९ ला भाजपासोबत निवडणूक लढवली आणि त्यांच्यासोबतही दगाबाजी केली. त्यामुळे दगाबाज कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचंही देशपांडे म्हणाले.