मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कट्टर समर्थकाने आत्महत्या केली आहे. नांदेडचे मनसे जिल्हाप्रमुख असणाऱे संभाजी जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून आपला पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांना साथ देणाऱ्यांमध्ये संभाजी जाधव यांचाही समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी जाधव हे शेतकरी होते. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. संभाजी जाधव नांदेडच्या डौर गावचे रहिवासी होते. तरोडा नाका परिसरात ते राहत होते. विद्यार्थी काळापासूनच ते राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. त्यावेळी ते विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून आपला मनसे पक्ष स्थापन केल्यानंतर संभाजी जाधवदेखील पक्षात सामील झाले होते. तेव्हापासून ते नांदेडचे मनसे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत होते. शेती हा संभाजी जाधव यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत होता. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी असणाऱ्या संभाजी जाधव यांच्या डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. यामुळे नैराश्यातून त्यांनी तरोडा नाका परिसरातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला असल्याची माहिती आहे. दरम्यान आत्महत्या करण्यामागे अजून कोणतं कारणे आहे का याचा तपास सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावण्यात ठाण्यातील मनसैनिक प्रविण चौगुले याने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी प्रविणने त्याच्या काही मित्रांना एक मेसेज पाठवला होता. राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे आपण दुखावलो आहोत. त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मेसेज त्यानं आत्महत्येपूर्वी केला होता, असे सांगण्यात आलं आहे.