परराज्यात जाण्यासाठी असलेला अर्ज भरण्याच्या वादातून नालासोपारा येथील कळंब गावात एका कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात दोनजण जखमी झाले आहेत. कळंब गावातील १५ ते २० जणांनी फिर्यादीच्या बंगल्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

नालासोपारा पश्चिमच्या कळंब गावात राहणारे ब्रिजेश चौहान (३०) हे मुंबईत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तसेच ते गावात सामाजिक कार्य देखील करतात. गावातील काही उत्तर भारतीय नागरिकांना ते परराज्यात जाण्याचे अर्ज भरून देण्यास मदत करत होते. सोमवारी गावातील दर्शन घरत याने त्याच्या माणासांचा अर्ज आधी भरण्यास सांगितले. मात्र ब्रिजेशने त्यांना उद्या येण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी दर्शन घरत आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी चौहान यांच्या बंगल्यावर लाठ्या, दगड आणि सळई घेऊन हल्ला केल्याचा आरोप चौहान यांनी केला आहे.

या हल्ल्यात ब्रिजेश चौहान यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत. जमावाने बंगल्याच्या काचा फोडून दगडांनी हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. वसई पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात मारहाण केल्याप्रकरणी कलम ३२३, ३२४ तसेच आपत्ती व्यवस्थापन आदेश भंग केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली.