संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता टीका केली होती. विशेषतः फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरही पवार यांनी भाष्य केलं होतं. सामनात तीन दिवस प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीवरून भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राणे म्हणाले, “सगळ्यांना माहिती आहे, करोनामुळे देशात व जगात हाहाकार झाला आहे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. करोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. याविषयी मुलाखतीत मार्गदर्शक केलं असतं, तर मी समजलं असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली. शरद पवारांवर जितकी टीका सामनातून झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून झाली नाही. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामनातील ही मुलाखत हेच राजकारण आहे,” अशी टीका राणे यांनी केली.

“मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभूत करतात, हे कोणाला उद्देशून होतं. नाव का नाही घेतं. पण हे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आहे. फडणवीस हे घमेंड करणारे, गर्व करणारे व्यक्ती नाहीत. सत्तेवर असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाची मस्ती आली, असं एकही उदाहरण कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रचारात म्हटलं असेल, मी पुन्हा येईन. यात घमेंड गर्व नाही, हे आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी वाक्य आहे. मी पाच वर्षे यशस्वी काम केलं. त्यामुळे लोक मला निवडून देणार, तो विश्वास त्यांनी त्यातून व्यक्त केला. मग शरद पवार यांना असं का दिसावं, त्यामुळे ही हेडिंग बरोबर नाही. १०५ आमदारांमध्ये शिवसेनेचं योगदान काय. २०१४ मध्ये शिवसेनेचे खासदार, आमदारा निवडून आले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. २०१९ मध्येही मोदी आणि भाजपामुळे शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले. हे तिघे एकत्र आले, यांचं आश्चर्य आहे. काही नेत्यांच्या तोंडून मी ऐकलं होतं की, शिवसेना जातीयवादी पक्ष आहे. मग आता एकत्र कशामुळे आले. ते जनतेला समजून सांगितलं असतं, तर बरं झालं असतं,” असं राणे म्हणाले.