नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एक काळ असा होता की जळगाव जिल्हाही राष्ट्रवादी विचारांचा होता. मात्र हा विचार नंतर मागे पडला, त्यामुळे भाजपाची ताकद वाढली. जळगावात भाजपा मोठा होण्यामागे एकनाथ खडसे यांची मेहनत होती. मात्र त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. नाथाभाऊ आता आपल्या पक्षात आले आहेत. त्यांनी माझ्याकडे कोणतीही मागणी केली नाही. एका शब्दाने त्यांनी हे सांगितलं नाही की ही माझी अपेक्षा आहे. एकनाथ खडसे यांचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरणार आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

आणखी वाचा- कटप्पाने बाहुबली को क्यो मारा; जयंत पाटलांची भाजपावर टोलेबाजी

काय म्हणाले एकनाथ खडसे?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आयुष्यातली ४० वर्षे मी भाजपामध्ये काम करत आलो आहे. ४० वर्षे पक्षात राहिल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत वारंवार माझी बदनामी झाली, छळ करण्यात आला. गैरव्यवहार असेल तर कागदपत्रं द्या.. मात्र या क्षणापर्यंत मला उत्तर मिळालेला नाही. मी आजवर खूप संघर्ष केला. मंत्रिमंडळात येण्यासाठीही मला संघर्ष करावा आहे. तो माझा स्थायीस्वभाव आहे.

आणखी वाचा- त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन; एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

भाजपाला रामराम केल्यानंतर अखेर आज एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी एकनाथ खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं असून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे.