आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयाराम गयारामांची संख्या सध्या वाढत चालली आहे. राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. नुकतेच सचिन अहिर आणि चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, आपण सत्ताधारी पक्षात जावे ही जनतेची मागणी असल्याचे मत वैभव पिचड यांनी यावेळी व्यक्त केले. अकोले येथे पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी याबाबत घोषणा केली. पिचड यांच्या निर्णयानंर मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्द केले आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले. तसेच कधीकधी कटू निर्णय घेण्याची वेळ येते आणि ती आता आली असल्याचे मत व्यक्त केले. विरोधी पक्षात राहून आमदार म्हणून काम करताना अनेक विकासकामांचा वेग मंदावला आहे. तसेच अनेक प्रश्नही प्रलंबित राहिले आहेत. आपण सत्ताधारी पक्षात जावे ही जनतेची मागणी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे वैभव पिचड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मधुकर पिचड हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा भाजपात प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना धक्का मानला जात आहे. 30 जुलै रोजी पिचड हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. माझ्या वैयक्तिक निर्णयापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्टीकरण मधुकर पिचड यांनी दिले.