“जे पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने खुप काही दिलं. पूर्वी निष्ठा होती परंतु आता निष्ठेला महत्व राहिलेलं नाही. जाणाऱ्यांना भीती, प्रलोभने दाखवली जात आहे. आम्ही १५ वर्ष सत्तेत होतो. विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं ते आज घडतंय,” अशी टीका राष्ट्रीवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. वाशिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाच हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप पवार यांनी केला. पाच वर्षांत राज्याला या सरकारने कंगाल करुन टाकले आहे. ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. सरकारकडून निव्वळ आश्वासनं दिली जात आहेत. सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली आहे. तसेच गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे.” हे सगळं संपवायचं असेल तर आघाडीला निवडून दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

“भाजपाने नवीनच पद्धत अवलंबली आहे. ते निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा अंदाज बघतात आणि त्यांना गोळा करत आहेत. हे लोकशाहीला मारक आहे लोकशाहीचा गळा घोटणारे आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.