अनिल देशमुख, परमबीर सिंग सध्या कुठे गायब आहेत हे राष्ट्रवादीने जाहीर करावं, असं आवाहन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सीबीआय-ईडी अनिल देशमुखांना शोधत आहेत पण ते सापडत नाहीत आणि याबद्दल गृहविभागाला काही माहिती नाही, हे आश्चर्यच असल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली होती. त्यावरच आता नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

याबद्दल बोलताना नवाब मलिक म्हणाले, “ते त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, राज्यात आहेत, देशात आहेत. पण तरीही ते फरारी आहेत का? हद्दपार आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यांच्या पक्षाने नेते हद्दपार आहेत, ज्यांच्या पक्षाचे लोक फरारी आहेत त्यांनी याप्रकरणी प्रश्न विचारू नयेत”.

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर, येथे वाचा…

“स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, करोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे.” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती.

“तुमच्यावर सरकार म्हणून कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही. आपलं नियंत्रण नाही असं समजायचं का?, राज्यातील अधिकाऱ्यांनी सातत्याने राज्याच्या विकासासाठी सरकार कोणाचेही असो त्याला समर्थन दिले आहे व सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण तुमचे उद्देशचं या ठिकाणी जनहिताचे नसतील आणि व्यक्तिगत स्वार्थाचे काही निर्णय असतील तर अधिकारी अशावेळी मदत करत नसतात. जर चुकीचे होत असेल तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती जात असेल. मात्र ठरवून देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्याचे काही कारण नाही.” असे दरेकर म्हणाले होते.