वर्ध्यामधील हिंगणघाट येथे जळीतकांडामध्ये गंभीर जखमी झालेल्या पिडितेचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. मुलीच्या मृत्यूच्या बातमीनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक राजकीय नेत्यांनाही या तरुणीच्या मृत्यूनंतर आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. काही राजकीय नेत्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही आपला संताप ट्विटवरुन व्यक्त केला आहे. काय म्हणाले निलेश राणे निलेश राणे यांनी टोकाची भाषा वापरत आपला संताप व्यक्त केला आहे. "हिंगणघाटमधील आमच्या बहिणीचा जीव गेला. पोलिसांना बंदुका फक्त हवेत गोळी मारायला दिल्या आहेत काय?," असा सवाल निलेश यांनी उपस्थित केला आहे. आरोपीला ठार मारण्याची मागणीही निलेश राणे यांनी ट्विटवरुन केली आहे. "महाराष्ट्रामध्ये मुलींना किंवा महिलांना नको त्या नजरेने कोणीच बघू शकत नाही, हे दाखवून देण्यासाठी हे प्रकरण एक उदाहरण होऊ द्या. या आरोपीला ठार मारा," असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. "माझ्यासमोर आरोपीला जिवंत जाळा"; पीडितेच्या वडिलांची मागणी हिंगणघाट येथील जळीतकांडामधील पीडितेचा मृत्यू#hinganghat #Wardha #Crime #Maharashtra — LoksattaLive (@LoksattaLive) February 10, 2020 "महाराष्ट्रात जंगलराज सुरु आहे का?" राणे यांच्याआधीच महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख असणाऱ्या प्रवीण अलई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना "महाराष्ट्रामध्ये कांग्रेस सरकारच्या कार्यकाळात जंगलराज सुरु आहे का?," असा सवाल उपस्थित केला आहे. अलई यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे जुने ट्विट कोट करुन रिट्विट करत आपले मत नोंदवले आहे. "महाराष्ट्रातील हिंगणघाट येथील शिक्षिकेला विकेश नगराळेने पेट्रोल टाकून जाळले. आज या तरुणीचा दु:खद मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये कांग्रेस सरकारच्या कार्यकाळात जंगलराज सुरु आहे का?," असे ट्विट केलं आहे.