जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे भाविकांतून स्वागत महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एका रांगेत आणण्याचा निर्णय नूतन जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. मंदिरातील व्हीआयपींच्या वाढत्या यादीमुळे सामान्य भाविकांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रविवारपासून व्हीआयपी दर्शन संस्कृती मोडीत काढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे दलालांची मोठी गोची झाली असून भाविकांतून मात्र स्वागत होत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपीच्या नावाखाली कोणालाही थेट प्रवेश दिला जात होता. त्यामुळे शेकडो मल प्रवास करुन दर्शनासाठी आलेल्या सामान्य भाविकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते. व्हीआयपी संस्कृती केंद्र शासनाने बंद केली तरी श्री तुळजाभवानी मंदिरात ती सुरुच होती. मंदिरात व्हीआयपी दर्शन देण्याच्या शिफारशीचे अधिकार जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, आमदार, नगराध्यक्ष, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंदिर प्रशासकीय व्यवस्थापक तसेच पोलीस अधिकाऱ्यांना होते. यात पोलीस अधिकाऱ्यांकडून केलेल्या व्हीआयपी शिफारशी मोठय़ा प्रमाणावर होत्या. परिणामी तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा जणू बाजार मांडल्याचा आरोप भाविकांमधून केला जात होता. मंदिरात अक्षरश: व्हीआयपी दर्शन घेणाऱ्यांची स्वतंत्र रांग लागत असे. मात्र, नूतन जिल्हाधिकारी गमे यांनी, व्हीआयपी संस्कृती बंद होऊन मंत्री, अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवे हटविले असताना येथे ही पद्धती कशी चालू शकते, असा प्रश्न उपस्थित करुन व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद केली. त्यामुळे व्हीआयपी दर्शन देणाऱ्या दलालांची मोठी अडचण झाली आहे. व्हीआयपी दर्शनाबाबत लवकरच वेगळे निकष ठरवले जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.