परवानगीविना नववी-दहावीचे वर्ग; २०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

निखील मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : बेकायदा शाळांना कायदाचा बडगा दाखविणारी पालघर जिल्हा परिषद स्वत:च्याच शाळेत नववी व दहावीचे वर्ग चालवित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.   सुमारे २०० विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत.

पालघर जिल्ह्यत सुरुवातीला  जिल्हा परिषदेच्या इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा होत्या. परंतु आठवीतील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने  शासन मान्यतेने नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. शासनाने २०१८ मध्ये प्रथम जिल्ह्यतील जिल्हा परिषदेच्या  ६० शाळांना नववी व दहावीच्या वर्ग वाढीसाठी मंजुरी दिली. मात्र त्यात केवळ जिल्हा परिषदेतील ३९ शाळांमध्ये हे वर्ग सुरू झाले. तर  काही कारणांमुळे उर्वरित २१ शाळांमध्ये वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. असे असतानाही २०१९ मध्ये आणखी  २३ शाळांमध्ये  नववी, दहावी वर्ग वाढीच्या मान्यतेसाठी  शासनाकडे  प्रस्ताव पाठविण्यात आले.  परंतु शासनमान्यतेची वाट न पाहता  हे वर्ग या शाळांमध्ये  सुरू करण्यात आले आहेत. सुमारे  १५० ते २०० हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १० वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा या राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येतात.  त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी इतर अधिकृत शाळांमधून  प्रवेश नोंदणी करून परीक्षेला बसावे लागण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, ज्या शाळांमध्ये असे बेकायदा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पालकांनाही ते माहिती नाही.त्या वर्गांमध्ये पुरेसा शिक्षक वर्ग देखील नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांंच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.  विद्यार्थ्यांंसह या शाळांचेही नुकसान होणार आहे, अशी भीती व्यक्त होत आहे.

बेकायदा वर्ग चालविणाऱ्या जिल्हा परिषद शाळा

तलासरी: कोचाई पाटील पाडा, वेवजी काटीलपाडा, आच्छाड इंडस्ट्रीज

विक्रमगड: डोल्हारी बुद्रुक, सावरोली, दादडे, खडकी

वसई: मेढे डहाणू: मोडगाव, चंद्रनगर, कैनाड नाईकपाडा, घोळ, वेती, आंबोली, भराड, खाणीव, दाभाडी पाटीलपाडा, सावरपाडा, गंजाड, तवा, कोसेसरी

पालघर: पोळे जिल्हा परिषद व शिक्षण विभाग याला सर्वस्वी जबाबदार आहेत, हे मान्य असले तरी तात्काळ वर्ग मान्यता घेण्यासाठी प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदेची राहील.

-निलेश सांबरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, जि. प.पालघर

बेकायदा वर्ग चालविणे ही गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांंच्या भवितव्याशी हा खेळ सुरू  आहे. शिक्षण विभाग या नुकसानीला सर्वस्वी जबाबदार आहे. शिक्षणासाठी जागृत असलेल्या शिक्षण सभापतींना ही बाब लक्षात न येणे ही खेदाची बाब आहे.

सुरेखा थेतले, विरोधी पक्षनेत्या