पालघर, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांची फरफट थांबणार आहे. या शस्त्रक्रिया विभागाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू होते. तीन ग्रामीण तालुक्यांतील एक लाखाहून अधिक नागरिकांना या केंद्राचा यामुळे मोठा फायदा होणार आहे. या केंद्रात सहा खाटांची व्यवस्था आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत हे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने रस्ते अपघात झाल्यानंतर जखमींना प्राथमिक उपचारासाठी ते लाभदायक आहे. या केंद्रात दररोज शेकडो बारुग्ण तपासणीसाठी येत असतात. तसेच प्रसूतीही या प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्या जातात. याचबरोबरीने लहान व शक्य असलेल्या शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रात होतात. गेली दोन वर्षे येथील रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी माठय़ा शस्त्रक्रियेसाठी जात होते. शस्त्रक्रिया विभाग सुरू झाल्यानंतर आतापर्यंत तीस कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य केंद्राने ठेवले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली. या शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन बुधवारी जिल्हा परिषदेचे पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ व आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले. शस्त्रक्रिया विभागाचे अद्ययावतीकरणाचा फायदा येथील गरजू आदिवासी जनतेला होणार असल्याचा आनंद आहे. तसेच रस्ते अपघातांत जखमींना प्राथमिक उपचार लवकर देणे शक्य आहे. - डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी