स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत संधी मिळून सहभाग वाढला, तर सकारात्मक बदल होतात, त्यामुळे स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी येथे केले.

भारतीय सेवा सदन संचालित श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भारतीय सेवा सदनचे उपाध्यक्ष आ. गोपीकिशन बाजोरिया, संस्थेचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, उपाध्यक्ष रवींद्रकुमार गोयनका, सचिव आलोककुमार गोयनका,  प्राचार्य डॉ. देवेंद्र व्यास, डॉ. गणेश बोरकर उपस्थित होते. डॉ. देवेंद्र व्यास यांनी अहवाल वाचन केले. आ. गोपीकिशन बाजोरिया यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जात, लिंग भेद, वर्ण, आर्थिक स्थिती यावरून अनेक संधी वगळण्याचे प्रयत्न अनुभवास येतात. जगात अनेक बदल घडत आहेत. सामाजिक सुधारणांमुळे आज स्त्रिया विविध पदांची जबाबदारी सांभाळत आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, महर्षि कर्वे यांच्यासारखे समाजसुधारक नसते तर आज आपण कुठे असतो? याचा विचार सर्व मुलींनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, मुलींनी कायदे साक्षरतेचा तसेच शाश्वत विकासाच्या योजनांबाबत अभ्यास करावा. आयुष्यात कधी निराशा आली तर मैत्रिणी या एकमेकींचे अधिक चांगल्या पद्धतीने समुपदेशन करू शकतात, मुलींनी एकमेकींची उमेद वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राधा स्वाजियानी, डॉ. शालिनी बंग यांनी केले, तर प्रा. ललित भट्टी यांनी आभार मानले.