वसईतील ‘होली फॅमिली’ शाळेच्या आवारात केरळमध्ये तयार केलेले जैवइंधन संयंत्र

कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट करताना स्थाकि स्वराज्य संस्थेच्या यंत्रणांवर ताण येणार नाही आणि त्यातून दैनंदिनी जीवनात उपयोगही होईल, असा दुहेरी कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. कचरा विल्हेवाटीची समस्याच वसईतील एका शाळेने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. शाळेत कचऱ्यापासून गॅस तयार करण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार वसई विरार महापालिकेने साडेतीनशेहून अधिक सदस्य असलेल्या मोठय़ा निवासी संकुलांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याचा आणि त्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविणे बंधनकारक केले आहे. काही गृहसंकुलांमध्ये खतनिर्मिती प्रकल्प राबविणे अडचणीचे ठरले आहे. सध्या १०० संकुलात खतनिर्मिती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कचरा निर्मितीच्या जागेतच जास्तीत जास्त कचरा विल्हेवाटीचे वसई  पालिकेचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण करता आलेले नाही. यावर ‘होली फॅमिली’ या शाळेने मात्र फिरते जैवइंधन संयंत्र (पोर्टेबल बायोगॅस) प्रकल्प राबवून कचऱ्यापासून गॅसनिर्मितीचा प्रयोग राबवला. त्यात त्यांना यशही आले आहे.

शाळेच्या चार हजारांहून अधिक विद्यार्थी आणिल दीडशे शिक्षक आहेत. तसेच येथे वसतिगृहसुद्धा आहे. शाळेत रोज  दहा किलो ओला आणि सुका कचरा तयार होत असतो. खतनिर्मिती करणे शक्य नसल्याने शाळेने केरळमध्ये तयार केलेले फिरते जैवइंधन सयंत्र ऑगस्ट २०१८ मध्ये  शाळेच्या आवारात आणून बसवले.  या सयंत्रात कचरा टाकल्यानंतर त्यातून गॅस तयार होतो. द्रव रूपातील खत तयार होते. वसतिगृहातील स्वयंपाक तयार करण्यासाठी संयंत्रातून निर्माण होणाऱ्या जैवइंधनाचा वापर केला जात आहे. तसेच द्रव रुपातील खत हे शाळेभोवतीच्या छोटय़ा उद्यानांना दिले जाते.