देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे मित्रपक्ष ‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध आहे असे मत आंबेडकर यांनी परभणीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकाश आंबेडकर आज मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ‘वंदे मातरम्’ संदर्भात प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ‘वंचित बहुजन आघाडीचा भाग असणाऱ्या असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमचा ‘वंदे मातरम्’ला विरोध आहे. तर त्यासंदर्भात तुमची भूमिका काय?’, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

चारही मोठे पक्ष वर्चस्ववादी

बहुजन वंचित आघाडीला सर्वच समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे आंबेडकर यांनी सांगितले. आम्ही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे सांगतच ओबीसी समाजातील लहान घटकांतूनच सर्वाधिक उमेदवार दिले जाणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले. बहुजन वंचित आघाडीने असदुद्दीन ओवेसींच्या ‘एमआयएम’शी मैत्री केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही मोठया पक्षांनी अतिशय हिनपणे जातीचा उल्लेख केला. या सर्व मोठ्या पक्षांच्या असल्या हिडीस प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. ज्यावेळी जाती आणि धर्माच्या राजकारणाला आव्हान दिले जाते त्यावेळी द्वेषाचे राजकारण होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही मोठ्या पक्षांची मानसिकता वर्चस्ववादी असल्याचे आरोप आंबेडकरांनी केला.