दिगंबर शिंदे अवकाळी पावसाने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णासारखी द्राक्षाची स्थिती झाल्याने जिल्ह्य़ातील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकावर कुऱ्हाडीचे घाव घातले आहेत. खरीप हंगामाबरोबरच द्राक्ष पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहाटेचे धुके, दुपारचे ऊन आणि सायंकाळचा पाऊस अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष पीक जगवणे मुश्किल झाल्याने द्राक्ष बागायतदार टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यासह विविध भागातील द्राक्षे, ऊस, मका यासह इतर शेती पिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे साठ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पिकांना अवकाळी पावसाबरोबरच विचित्र हवामानाचा फटका बसला आहे. करपा, दावण्या, भुरी आदी बुरशीजन्य रोगांची लागण झाल्याने वेलीवरील घड गळून पडत आहेत. कर्ज काढून पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू असताना रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढतच आहेत. बागा वाचविण्यासाठी एकरी पाच हजार रुपयांची औषध फवारणी दररोज करूनही हाती काही येईल याची खात्री उरलेली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या मिरज तालुक्यातील बेडग येथील विनायक संभाजी कुंभार या शेतकऱ्याने पाऊण एकर आरके जातीच्या द्राक्षबागेवर कुऱ्हाडीचे घाव घालून बाग तोडून टाकली. तसेच तासगाव तालुक्यातील विसापूर येथील माणिक माने, तुकाराम जाधव व पिंटू माने यांनीही रोगाला अटकाव करण्यात येत असलेल्या अपयशामुळे द्राक्ष बागांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. लाखोंची गुंतवणूक धोक्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दावणी, करपा, मुळकुज अशा गोष्टींचा प्रादुर्भाव वाढला आहे. द्राक्ष बागांच्या लागणीची लाखो रुपयांची गुंतवणूक सोसायटीचे कर्ज काढून करण्यात आली आहे. याचबरोबर यंदाच्या हंगामात फळछाटणीपासून औषधे, खते यासाठी दररोजचा खर्च करावा लागत असल्याने या वैतागातून बागेवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालविली आहे.