काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वक्तव्यं आम्ही गांभीर्याने घेत नाही तुम्हीही घेऊ नका असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सोशल मीडिया भाजपा आणि आरएसएसच्या ताब्यात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता राहुल गांधींची वक्तव्यं आम्ही गांभीर्याने घेत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी करोना्च्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नागपुरातल्या करोना स्थितीबाबत विचारलं असता ते म्हणाले.  नागपुरात आणखी करोना चाचण्या वाढवणं आवश्यक आहे. करोना चाचण्या वाढवल्या तर लवकर रुग्ण आढळतील. त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांच्यावर उपाय करता येतील. नागपूरसाठी आणखी काय काय करता येईल त्याची चर्चा आम्ही सरकारशी करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.