रायगडमधील देवकुंड धबधबा येथे बुडालेल्या तिघांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. तहसील प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस व राफ्टिंग क्लब यांनी संयुक्त शोधमोहीम राबवत या तिघांचे मृतदेह बाहेर काढले. माणगाव तालुक्यातील पाटनस येथील देवकुंड धबधब्यावर रविवारी पुण्यातील आयटी कंपनीत काम करणारे पाच तरुण वर्षा सहलीसाठी आले होते. मात्र, देवकुंड धबधब्याच्या डोहाचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. यातील दोन जणांनी स्वत:चा जीव वाजवला. पण अन्य तिघे जण बुडाले. रविवारी रात्रीपर्यंत तहसील प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस व राफ्टिंग क्लब यांनी संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली. शेवटी अंधारामुळे ही मोहीम थांबवावी लागली. अखेर सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीमेला सुरूवात झाली. दुपारी या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. संदीप सिंग, सतिंदर लांबा आणि विश्वजित कुमार अशी या मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. पर्यटकांचे होणारे मृत्यू लक्षात घेऊन कर्जत, खालापूर आणि माणगाव तालुक्यातील धरणे आणि धबधब्यांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. रविवारपासूनच देवकुंड धबधब्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिल्याच दिवसी तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने या भागातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.