आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शनिवारीही झोडपून काढले. आष्टी तालुक्यात कारखेल येथे वीज पडून १४ वर्षीय शिवकन्या कल्याण कावळे या मुलीचा मृत्यू झाला. चकलांबा जवळील घाडगेवस्तीवरील एका घरावर वीज कोसळल्याने दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने रात्री व रविवारी सकाळीही आपला जोर कायम ठेवला. या पावसाने रब्बीच्या पिकासह फळांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
 गेवराई तालुक्यातील चकलांबाजवळील घाडगेवस्तीवर रविवारी सकाळी आठच्या सुमारास सुरू झालेल्या पावसात घरावरच वीज कोसळली. यात जत्राबाई सारंग नवले व नीलाबाई विष्णू देशमुख या दोन महिला गंभीर जखमी झाल्या. तर घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली. अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.