करोना प्रतिबंधाच्या निर्बंधांमुळे सध्या राज्यातल्या सण-उत्सवांवर बंदी आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या दहीहंडी उत्सवाला सरकारने परवानगी नाकारली असतानाच मनसेसह भाजपानेही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने दहीहंडी साजरी केली. मनसेच्या अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर यामुळे गुन्हेही दाखल झाले होते. अशा गनिमी काव्याच्या दहीहंडीनंतर आता राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाबद्दलही सूचक वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरे आज पुण्यात आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी त्यांनी आज शाखा अध्यक्षांसह पदाधिकारी आणि मनसैनिकांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेशोत्सवाबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की, या करोना निर्बंधांमुळे साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबद्दल आपण गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करणार आहे. आणि त्यानंतर पुढे बघू.

हेही वाचा – निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट; ओबीसी आरक्षणावरुन राज ठाकरेंचा आरोप

निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी केल्याप्रकरणी मुंबईत नऊ, तर ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बहुतांश गुन्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधातील आहेत.

राज्य सरकारने सार्वजनिकरीत्या दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केली होती. मात्र, निर्बंध झुगारून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी साजरी केली होती. या प्रकरणी शिवाजी पार्क, काळाचौकी, कस्तुरबा मार्ग, वरळी, साकीनाका, घाटकोपर, भांडुप, खेरवाडी आणि पार्कसाईट आदी नऊ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘मातोश्री’जवळ दहीहंडी साजरी करणारे मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पहाटेच्या वेळी दादर भागातील आर. के. वैद्य मार्गावर दहीहंडी साजरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी देशपांडे यांच्यासह अन्य सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले.