करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशभरामध्ये जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक मजुरांनी आपल्या गावी परत जाण्यास सुरुवात केली. मुंबईसहीत महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून उत्तर भारतीय कामगार त्यांच्या राज्यांमध्ये परतले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा मागील अनेक आठवड्यांपासून सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्यासंदर्भात अनेकदा मतप्रदर्शन केलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासहीतच नितीन सरदेसाई सुद्धा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मराठी तरुणांनी सुरु केलेल्या उद्योग व्यवसायांसंदर्भात माहिती देत असतात. मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ठाकरे कसे आहेत यासंदर्भात नुकतीच सरदेसाई यांनी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. “राज्यातील परप्रांतीय राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधी महाराष्ट्रातील तरूणांपर्यंत पोहोचवाव्या. त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल,” अशी सूचना राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सरकारला केली होती. त्यानंतरही अनेकदा मनसेने या मागणीची पाठपुरवठा केला. मात्र राज हे केवळ पाठपुरवठा करुन थांबलेले नाहीत तर पाचवा लॉकडाउन सुरु झाल्यानंतर हॉटेलला घरपोच डिलेव्हरीची परवानगी देण्यात आली आहे हे समजल्यानंतर राज यांनी अनेकांच्या घरी मराठमोळ्या हॉटेलमधून पार्सल पाठवली आहेत. यासंदर्भातील एक पोस्टच सरदेसाई यांनी फेसबुकवर केली आहे. मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज यांचा स्वभाव असल्याचे सरदेसाई यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. "'प्रकाश' हे दादरच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीतील एक मानाचं पान. लॉकडाऊन दरम्यान मागील ७० दिवस बंद असलेलं हे उपाहारगृह फक्त पार्सल करीता सुरु झालं आणि पहिल्याच दिवशी या उपाहारगृहातून माझ्या घरी पार्सल आलं. आश्चर्य वाटलं. नंतर कळलं की राजसाहेबांनी माझ्यासह त्यांच्या अनेक मित्र व स्नेही यांच्याकडे अशीच पार्सलं पाठवली," असं सरदेसाई यांनी सांगितलं आहे. परदेशामध्ये गेल्यावरही मराठी उद्योजकांकडून खरेदी करण्याला राज यांचे प्राधान्य असतं असं सरदेसाई सांगतात. "प्रकाशमधून खाणं पार्सल पाठवणं हे तर एक उदाहरण झालं, पण अशाच अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. धारगळकर यांची माहीमची ‘प्रसाद बेकरी’ असो, चितळे बंधू असो की रत्नागिरीतले भिडेंचं ‘योजक’ असो. मराठी उद्योजकांकडूनच खरेदी करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. बरं, खरेदी ही एवढी की एखादी गाडी फक्त सामानानेच भरून जावी! परदेशात गेल्यावर सुद्धा जर तिथे एखाद्या मराठी माणसाचे दुकान अथवा व्यवसाय असल्यास ते हटकून त्याच्याकडेच खरेदी करतात," असं सरदेसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वडापाव खाण्याचा आदेश राज हे जगभरातील मराठी व्यवसायिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असतात असं सांगताना सरदेसाई यांनी एक किस्सा या पोस्टमध्ये सांगितला आहे. "काही वर्षांपूर्वी आम्ही लंडनमध्ये असताना तिथे वडापावचे हॉटेल सुरु करत असल्याचे काही मराठी तरुणांनी भेटून सांगितले. राजसाहेबांनी आत्मीयतेने त्यांच्याकडून सगळी माहिती आणि त्यांच्या भविष्यातील योजना ऐकून घेतल्या आणि मुंबईत आल्यावर भेटायचे आमंत्रण सुद्धा दिले. एवढेच नव्हे तर जितके दिवस आम्ही लंडनमध्ये होतो तितके दिवस, भेटणाऱ्या प्रत्येकाला आणि नंतरही मुंबईतून लंडनला जाणाऱ्या प्रत्येक मित्राला तिथे जाऊन वडापाव खाण्याचा आदेश वजा आग्रह ते करत होते," असं सरदेसाई यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र धर्म वाढवावा या एकाच उद्देशाने राज ठाकरे हे सर्व करत असल्याचे सरदेसाई म्हणतात. "महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल प्रचंड आत्मीयता असणाऱ्या या नेत्यासोबत मी काम करतोय याचा मला अभिमान आहे," असं म्हणत सरदेसाई यांनी या पोस्टचा शेवट केला आहे. सरदेसाई यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट मनसेच्या अधिकृत अकाउंटवरुन ट्विट करण्यात आला आहे. 'मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावा; ह्यासाठी कटाक्ष असणारा नेता म्हणजे राज ठाकरे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितला अनुभव,' अशी कॅप्शन देत हा स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आला आहे. मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावा; ह्यासाठी कटाक्ष असणारा नेता म्हणजे @RajThackeray. मनसे नेते @1nitinsardesai ह्यांनी सांगितला अनुभव. pic.twitter.com/XJPLfya6S7 — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 2, 2020 राज यांनी परप्रांतीय मजूर महाराष्ट्रातून बाहेर गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कोणत्या जागांवर नोकऱ्या उपलब्ध आहेत यासंदर्भातील माहिती पोहचवण्याची मागणी केली होती. “परप्रांतीय महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानं राज्यातील कारखाने, उद्योगधंदे बंद होऊ नये यासाठी राज्यातील तरूण वर्गापर्यंत रोजगार उपलब्ध असलेल्या ठिकाणांची माहिती सरकारने पोहचवावी. आपल्याकडे विदर्भ, मराठवाजा या ठिकाणी असलेल्या तरूणांपर्यंत अनेकदा माहिती पोहोचत नाही. त्यामुळे ही माहिती तरूण वर्गापर्यंत पोहोचवल्यास त्याचा राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी फायदा होईल,” असंही राज सरकारला सल्ला देताना काही आठवड्यांपूर्वी म्हणाले होते.